Monday 13 April, 2009

शेतकऱ्यांचा दावा आहे, उद्धव ठाकरे छावा आहे!

शिवसेनेचा ढाण्या वाघ प्रचारात उतरल्याबरोबर लगेचच विरोधकांची पळापळ सुरू झालेली आहे. शरद पवार, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, सोनियाबाई, परमपुज्य पंतप्रधान मनमोहन सिंग या सगळ्यांचा पर्दाफाश मा. उद्धवसाहेबांनी केलेला आहे. उद्धवसाहेबांच्या सवालांचे जवाब देताना या आघाडी वाल्यांची पळती भूई थोडी झालेली आहे.

कालच्या दिवसातील शिवसेना कार्यकारीप्रमुख मा. उद्धवजीनी केलेली महत्वाची वक्तव्ये पुढीलप्रमाणे:

कुही
प्रियंका म्हणते, मी कुठे म्हातारी दिसते? पण माझ्या देशातील जनता म्हातारी दिसते आहे, ते का? कारण जनतेच्या रक्ताचे शोषण करून कॉंग्रेसने आपले तारूण्य टिकून ठेवले आहे.

बारशिवणी
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बायका-मुलींनीही जीवन संपवले. ते तरूण नव्हते काय? या नेत्यांच्या म्हातारपण आणि तरूणपणापेक्षा आम्हाला दिसते ते आया-बहिणींचे दु:ख.

सावनेर
पाणी मागणाऱ्या जनतेवर कॉंग्रेसने लाठ्या चालवल्या. खेड्यापाड्यातील लोकांच्या पिढ्या बरबाद झाल्या. तुमच्या नशिबावर असा वरवंटा फिरवणाऱ्या कॉंग्रेसवर आतातरी वरवंटा फिरवा.

नरखेड
जातपात आम्ही मानत नाही. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्नेही होते. हेच बाळकडू आम्हाला मिळाले. चला शिवशक्ती-भिमशक्ती एक करूया.

कोंडाळी
मनमोहन नावाचे दुबळे बुवा पुन्हा पंतप्रधान म्हणून डोक्यावर घेऊ नका. दळभद्री कॉंग्रेसला याच मातीत गाडून टाका. नाहीतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे तडफडणारे आत्मे तुम्हाला जाब विचारतील.

तिवसा
शास्त्रीजींनी ’जय जवान...जय किसान’ नारा दिला होता. पण दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान मरतो आहे, तर किसान आत्महत्या करतो आहे. त्यांची कुर्बानी याद करा आणि नाकर्त्या कॉंग्रेसचा फैसला करा.

अचलपूर
तुम्ही ज्यांना दिल्लीत पाठवले, ते सोनियाची लाचारी करत बसले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत महाराष्ट्र नंबर वन. लोडशेडींग पण इकडेच जास्त. हे सगळे आपले, तिकडे दिल्लीत जाऊन झोपले.

Wednesday 8 April, 2009

कॉंग्रेस सरकार म्हणजे अराजक! - उद्धवसाहेब

मुंबईतील पवित्र शिवतीर्थावर नारळ वाढवून शिवसेना भाजप युतीच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि त्यापाठोपाठ शिवसेनेचा भगवा झंझावत पहिल्या प्रथम मराठवाड्यात येऊन दाखल झाला. परभणीचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार गणेश दुधगावकर यांच्या प्रचारार्थ स्टेडीयम मैदानावर उद्धवसाहेबांची अतिविराट सभा झाली.

उद्धवसाहेब म्हणाले, " नांदेडहून निघालो तेव्हाच पावसाची रिपरिप सुरू होती. पण मी मात्र मनातल्या मनात प्रार्थना केली. एकवेळ या पावसामुळे माझी सभा नाही झाली तरी चालेल, पण तहानेने व्याकुळलेल्या माझ्या जनतेला पाणी तरी मिळेल. त्यासाठी तरी हा पाऊस पडू देत. सभा झाली नसती तरी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी लोटलेला हा भगवा जनसागर शिवसेनेलाच मतदान करणार याची मला ठाम खात्री आहे. मी मनोरंजनासाठी सभा घेत नाही आहे. माझ्या महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्याला मी मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. हा निर्धार करूनच यावेळी घरातून बाहेर पडलो आहे."

"कॉंग्रेसचे सरकार म्हणजे अराजक! देशात आता पुन्हा हे खिचडी सरकार नकोय. कुठलेच निर्णय न घेणार नाकर्त्या कॉंग्रेसच सरकार जर पुन्हा आलं तर या देशात अराजकच निर्माण होईल." असा इशारा यावेळी उद्धवसाहेबांनी दिला. " शेतीतलं तुम्हाला कळत ना! मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्रच नंबर एक कसा?" असा भेदक सवाल कृषीमंत्र्यांना केला.
=============================================================
आम्ही म्हणे देशद्रोही...
कसाबला वकिल मिळू नये हा आमचा देशद्रोहीपणा ठरतो. गृहमंत्री जयंत पाटीलच तसे म्हणतात आणि मृत्यूला कवटाळले पण कसाबला सोडले नाही, त्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या शिवसैनिक भावाला अटक करून डांबले जाते. हे असे असेल तर पवारांनी सांगावे कोणाचे हात बरबटले आहेत ते.
=============================================================
विलासराव काठोड्याला गेले नाहीत
बीड जिल्ह्यात काठोडा येथे शेतकरी वस्तीवर भयंकर दरोडा पडला. नराधम दरोडेखोरांनी महिलांवरही अत्याचार केले. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. पण ते मात्र काठोड्याला गेले नाहीत. कारण रामगोपाळ वर्माला त्यावेळी वेळ नव्हता किंवा या विषयावर पिक्चर बनू शकत नव्हता.
=============================================================