मुंबईत खास करुन परळ-वरळी या विभागात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे समोर आलेले आहे. याच विभागात सर्वत्र बांधकाम सुरु आहे. बांधकामाच्या कामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात मलेरियाच्या डासांना पोषक ठरत आहेत. दुसरीकडे मलेरियावरुन राजकिय वातावरणसुद्धा तापलेले आहे. कोणाला परप्रांतियांमुळे मलेरिया वाढलेय असे वाटतेय कोणी शिवसेनेला यासाठी जबाबदार धरत आहे!
मुंबई महानगर पालिका प्रशासन याला जबाबदार आहे यात शिवसेनेचा काय दोष असू शकतो? महानगरपालिकेचे प्रशासन हे शेवटी राज्यसरकारनेच नेमलेले असते. शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत असल्याने शिवसेनेला त्रास देण्यासाठी सरकार असे ढिम्म आयुक्त नेमते का? आणि शिवसेनेमुळे जर मलेरिया वाढत आहे असे काहींना वाटत असेल तर त्यांनी इकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे कारण मलेरियावर सर्वात जास्त काम आज कोणी करत असेल तर ती शिवसेना आणि शिवसेना कार्यप्रमुख!
शिवसेना कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी मागिल रविवारी मुंबईच्या अनेक महानगरपालिका रुग्णालयांना भेटी दिल्या तेथील रुग्णांची चौकशी केली. परिस्थितीचा आढावा घेतला. यापूर्वीच श्री. उद्धवसाहेबांनी ’महाराष्ट्र देशा’ या पुस्तक विक्रितून येणारी रक्कम हि मलेरिया रुग्णांच्या औषधासाठी वापरणार असल्याची घोषणा केली.
कालच शिवसेना भवन येथे डॉक्टरांची बैठक घेऊन मलेरियाविरोधात अॅक्शनप्लान तयार केलेला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंट, एसआरएल, मेट्रोपॉलीज लॅब, आदी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मलेरियाच्या संकटापासून शहराला वाचविण्यासाठी या सर्व संस्थांनी आपापल्या परीने पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या सर्व संस्थांनी त्यासाठी दुपारी 2 ते 5 या वेळेत रुग्णसेवा करण्याची तयारी दाखविली.
एवढे सगळे शिवसेना करत असतानाही यासाठी शिवसेना जबाबदार म्हणणारे किंवा इतर नुसती बडबड करणारे काय करत आहेत, हाच मोठा प्रश्न आहे.