Tuesday, 1 September 2009

सगळीकडे शिवसेना, शिवसेना आणि शिवसेनाच!

महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते राज ठाकरे यांना सध्या शिवसेनेशिवाय चैनच पडत नाही आहे. पक्ष सोडून जाऊन तीन वर्षे झाली तरी शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नसावा असेच दिसतेय. हल्ली त्यांनी शिवसेनेचा धसकाच घेतला असला पाहिजे असेच काही आहे.

मुळात लोकसभेला जे मतदान झाले त्याने तसे राज ठाकरे हवेतच आहेत. आंदोलन न करता धमक्या दिल्याने जनतेचे प्रश्न सुटतात असे आजकाल त्यांना वाटू लागले आहे. असे आहे तर महाराष्ट्रात अनेक असे प्रश्न आहेत जे सुटणे आवश्यक आहे त्याबद्दल ते कधीच धमक्या देताना दिसत नाही. हे असे का? (सोप्पे कॉंग्रेसने स्क्रिप्ट दिल्याशिवाय आजकाल यांचे पानही हलत नाही).

म्हणे शिवसेनेत आता आक्रमक पणा उरलेला नाही! अहो पण आता तुम्ही शिवसेनेची काळजी कशाला करताय? तुमचा पक्ष आहे त्याची काळजी करा. तुमच्या पक्षात एवढा आक्रमकपणा आलाय की आज रस्त्यावरून चालणाऱ्या आयाबहिणींना तुमच्या लोकांपासून सुटका मिळण्याची गरज आहे. चोऱ्या, लुट, गाड्या जाळणे आणि बलात्कार करणे एवढेच काम तुमचे कार्यकर्ते सध्या आक्रमकपणे करत आहेत तर जरा तिकडे लक्ष द्या. आमचे उद्धवसाहेब आहेत पक्षाचे काय करायचे ते बघायला आणि हो आमचा ढाण्या वाघ सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेच.

महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत. गेली १० वर्षे जनता कॉंग्रेसच्या कामाने त्रस्त आहे आणि ते तुम्हाला दिसत असून गॉगलच्या आत वेगळेच काही चालले आहे. आज सर्वसामान्य माणसालाही हे कळते आहे. तुम्ही कॉंग्रेसचे पिल्लू आहात. तुम्ही कॉंग्रेसने सांगितल्याशिवाय काहीच करत नाही कारण काय? अर्थकारण की शिवसेना संपवण्याचा अफजलखानी विडा की मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी?

तुम्ही शिवसेनेचा जप करत आहात याबद्दल मुळीच राग नाही आहे कारण तुम्ही जे बोलता ते आम्ही सत्य मानायला आम्ही तुमचे कार्यकर्ते नाही आहोत किंवा जनताही तुमच्यासारखे कॉंग्रेसच्या ताटाखालचे मांजर नक्कीच नाही. तुम्ही टिका करा शिवसेनेवर हवी तेवढी करा... शिवसेना नेत्यांवरही करा पण एक विसरू नका मागच्या १० वर्षातल्या ७ वर्षे तुम्हीही शिवसेनेचे नेते होतात तेव्हा काय तुमची दातखिळी बसली होती का? एकूण काय शिवसेनेवर टिका करताना तुमचा नालायकपणाच तुम्हीच जनतेसमोर मांडताय... मांडा आणखी मजा येईल तुमचा लाफ्टर शो बघायला!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका १३ ऑक्टोबरला!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या १३ ऑक्टोबर रोजी होणार आहेत, म्हणजेच येत्या दिवाळी नंतर महाराष्ट्रात नविन सरकार अस्तित्वात येणार आहे. या निवडणूकीची अधिसुचना १८ सप्टेंबर रोजी जारी होईल त्याच दिवशी उमेदवार अर्ज भरण्याची सुरूवात होणार असून २५ सप्टेंबर हि शेवटची तारीख असणार आहे, २६ सप्टेंबर ला अर्जांची छाननी होईल २९ सप्टेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. मतमोजणी दिवाळीनंतर लगेचच म्हणजेच २२ ऑक्टोबरला पार पडणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी ७ कोटींहून अधिक मतदार आपले बजावू शकणार आहेत.

Saturday, 15 August 2009

गोविंदाची हि वेगळी ओळख

कालच्या दहिहंडी संदर्भात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला जवळ जवळ सगळ्याच पक्षांनी चांगला प्रतिसाद दिला. विशेषकरून मोठ मोठ्या दहिहंडी आयोजकांनी या बदल्यात जे उपक्रम राबविले त्याने महाराष्ट्राची आणखी अनोखी ओळख देशात पोहचली आहे.

मराठी माणूस तसा उत्सवप्रेमी आहे हे नविन सांगण्याची गरज नाही. परंतु स्वाईन फ्लू मुळे जे काही घडतेय किंवा घडलेय ते नक्कीच कुठल्याही संवेदनशिल माणसासाठी अतिशय दु:खदायक आहे. त्यातूनच उद्धवसाहेबांनी सर्व मोठ्या दहिहंडी आयोजकांना यंदाची दहिहंडी पारंपारिक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले तसेच बक्षिसरुपाने ठेवलेल्या रकमेचे सामाजिक कार्यासाठी वापर करण्यास सांगितले त्याप्रमाणे शिवसेनेच्या सर्व दहिहंडी आयोजकांनी कुणी मास्क वाटले, कुणी वैद्यकिय उपकरणे इस्पितळांना भेट दिली कुणी आणखी काय केले? यात जितेंद्र आव्हाड सुद्धा आलेच!

काही दिवटे असेही होते जे स्वत: बिहारी असून मुंबईच्या बाबतीत कधीही काही न बोलणारे मराठी माणसाच्या सणाचे महत्व पटवून देत होते किंवा स्वाईन फ्ल्यु बद्दल भिती बाळगू नये असे पाळपूद लावून आपले निवडणुकी अगोदर शक्ती प्रदर्शन करण्यात गुंतले होते. परंतु आज आपण विचार केल्यास ज्यांनी दहिहंडी आयोजन नाही केले त्यांचे योगदान यांच्यापेक्षा लाखमोलाचे आहे हे नक्कीच!

उत्सव बंद करणे कधीहि योग्य नाही परंतु जर वेळ तशीच आली तर आम्ही असे वेगळे काही करू शकतो हे कालच्या या काही घटनांवरून नक्कीच लक्षात आले!

Monday, 27 July 2009

उद्धवसाहेब - तरूणांचे आदर्श नेतृत्व

आजच्या देशाच्या राजकारणात फारच कमी आदर्श म्हणावेत असे नेते उरलेले आहेत. जे काही उरले आहेत ते आपल्या आयुष्याच्या उत्तारार्धात आहेत. भविष्याच्या राजकारणात सध्या तरी "आदर्श नेता" कोणी होईल असे चित्र नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातही काही वेगळे दिसतेय असे वाटत नाही. परंतु एक सच्चा माणूस हि पोकळी भरून काढण्याच्या दिशेने चालला आहे, नव्हे ती पोकळी निदान महाराष्ट्रापुरते म्हटल्यास भरून काढलेली आहे. ज्याला गोरगरीबांचे अश्रू दिसतात, शेतकऱ्यांची दारूण अवस्था पाहवत नाही, मुंबईतील गरीबांची दशा कळतेय, सर्वसामान्यांना नक्की काय हवेय याची संपूर्णपणे जाण आहे. तसेच स्वकर्तुत्वावर विश्वास असलेला माणूस आहे आणि तो म्हणजे आम्हा तरूण शिवसैनिकांचे लाडके उद्धवसाहेब!

शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून उद्धवसाहेबांना नक्कीच "मातोश्री" मध्ये बसून शिवसैनिकांना आदेश देऊन काम करता आले असते. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून शिवसेना वाढवण्याचे काम करत आहेत. शिवसैनिकांसह वेगवेगळ्या आंदोलनांत स्वत: सहभागी जनतेच्या कामांचा आवाज सरकारसमोर मांडत आहेत. शेतकरी आत्महत्यांविरोधात पुकारलेल्या जबरदस्त आंदोलनासमोर सरकारला झुकवून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली परंतु नालायक सरकारच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. शेतकरी आत्महत्या, देता की जाता, वीजभारनियमन, युएलसी आणि म्हाडा विरोधातील मोर्चा, रिलायन्स भाववाढीच्या विरोधातील आंदोलन अशा आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. सध्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणमंत्र्यांनी घातलेल्या गोंधळाला सामंजस्याची भूमिका वारंवार सुचना देऊनही शेवटी व्हायचा तो गोंधळ झालाच.

उद्धवसाहेबांचे व्यक्तीमत्व प्रत्यक्ष भेटणाऱ्याला चांगले कळते असे मला वाटते. महाराष्ट्राचे आणि मुंबईचे प्रश्न सच्चेपणाने आज फक्त उद्धवसाहेब मांडत आहेत. केवळ दगडफेक करून मराठी माणसांची मने भडकवणे सोप्पे आहे पण त्याच्या गरजांवर आवाज उठविणे सोप्पे नाही हे चित्रच सध्या आहे. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी, भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आज मराठी माणसांची नौका फक्त आणि फक्त उद्धवसाहेबच किनाऱ्याला लावू शकतात. शिवसेनेची सता असताना शिवसेनेने काय केलेले विचारणारे स्वत:च्या तुंबड्या भरून झाल्यावर हे प्रश्न निर्माण करीत आहेत. म्हणूनच एकदा उद्धवसाहेबांच्या हाती सत्ता आल्यास त्याची उत्तरे मिळतील किंबहुना सत्ता नसतानाही त्याची झळक मिळाली आहे.

आजच्या उद्धवसाहेबांच्या वाढदिवशी आपण सर्वांनी शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विधानसभेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी, एका सुसंस्कारीत, सुशिक्षित, आदर्श नेत्याकडे महाराष्ट्र सोपविण्यासाठी प्रत्येक तरूणांनी उद्धवसाहेबांचे मागे उभे राहावेच लागेल!

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Monday, 22 June 2009

वांद्र्याची आग आणि बिल्डर

परवा वांद्रे येथील पूर्वेकडील बेहराम पाडा झोपडपट्टीत लागलेल्या आगीमागे आता बिल्डराचा हात असल्याचा लेख आजच्या सामनामध्ये आलेला आहे तो लेख आपण इथे क्लिक करून वाचू शकता.

नविन बांधलेल्या स्कायवॉकवरून प्रवास करताना सहज नजर उजव्या बाजूला टाकली तरी तिथे ५-६ मजली झोपड्या दिसायच्या. मुंबईतील इतर खासकरून हिंदूबहुल वस्त्यांमध्ये असे प्रकार नाहीतच किंवा १४ फुटापेक्षा जास्त उंची जात असल्यास पोलिस तिथे कारवाईला हजर असतात. आजही आपण वांद्रे पश्चिमेला स्टेशनच्या बाजूला नजर टाकल्यास ३-४ मजली झोपड्या दिसतील.

मतांवर डोळा ठेवून राज्यशासन वेगवेगळ्या योजना मुस्लिमांसाठी आणत असतानाच आजच्या सामनामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे या झोपडपट्टीला तात्काळ एसआरए मध्ये कसे घेण्यात आलेय हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. बघू या काय काय घडतेय पुढे..!