Monday 21 January, 2008

उद्धव ठाकरे - द पॉलीटिकल वॉरिअर

सुचना: हा लेख दि. २० जानेवारी २००८ च्या ई-सकाळ.कॉम वरून घेतला आहे. याचे मुळलेखक पद्मभुषण देशपांडे आहेत.

राजकारण हा काही त्याचा प्रांत नाही,' यावर सगळ्यांचं एकमत होतं. कोणी म्हणे, "बॅंकेमध्ये काम करणारा संसारिक गृहस्थ म्हणून तो अगदी आदर्श आहे.' काही म्हणत, "शिवसेनेसारखी ज्वलजहाल संघटना याच्या हातात कधीच राहणार नाही.' राजकीय विरोधक, "त्याच्या नाकावरची माशी हलते का?' असा प्रश्‍न उपरोधाने विचारत.

"जंगलात जाऊन सुरक्षित ठिकाणी बसून फोटोबिटो काढणं ठीक आहे. ठाकरे आडनावाचा फायदा घेत हेलिकॉप्टर मिळवणं आणि त्यात बसून फोटो काढणं ठीक आहे. तेवढंच त्याचं काम-' शिवसेनेचेच कारभारी त्याकाळी खासगीत आपल्या जीभेचा पट्टा असा चालवत असत. मग, त्याच्यावतीने त्याची बायकोच कारभार करते, तुम्ही भेटायला गेलात की तीच दारात येऊन उभी राहते, हल्ली अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन फायलीही हाताळते... आणि नसेलच ती तर मिलिंद नार्वेकर असतोच. सगळा कारभार त्या दोघांच्याच हाती आहे... अशी कुजबूज मोहीम मित्रपक्षातून चाललेली असे.

अवघ्या पाच वर्षांत त्याने सगळ्यांची तोंडं बंद केली. आपल्या मार्गातले काटे अलगद दूर केले. प्रत्येकवेळी वेगळे डाव टाकले, मित्र पक्षावर गहिरे घाव टाकले. शिवसेना नावाची एक मजबूत फुरफुरती ताकद आज त्याची अंकित आहे. राष्ट्रीय मित्रपक्षाला त्याने काबूत आणले आहे आणि कॉंग्रेससारख्या पक्षालाही कोडे वाटावे अशा दिशेने तो आपल्या रणनीतीचे घोडे दामटतो आहे.

विरोधी पक्षाचे नेते तर सोडाच, पण त्याचे जानी दुष्मनही आता त्याच्याविषयी जपून बोलतात. येत्या निवडणुकीत तो कुणाला कशाची भेट देईल, याचा अंदाज बांधत असतात. चर्चा निघाली की आता ते म्हणतात, "उद्धव वाटतो तसा नाही. पक्का आतल्या गाठीचा आहे. त्याच्या चेहऱ्यावरून जाऊ नका. वडिलांपेक्षाही कट्टर आणि वेळ येईल तेव्हा कठोर होणारा आहे. परिस्थितीने त् य ाला पुरेसा वाव मिळालेला नाही. पण, जेव्हा त्याचे दोन्ही हात मोकळे होतील तेव्हा बघा...'

शिवसेनेचा कार्याध्यक्ष म्हणून २१ जानेवारी २००२ रोजी उद्धव ठाकरे यांनी सूत्र आपल्या हाती घेतली. २१ जानेवारी २००७ मध्ये त्याने आपल्या विषयी असणारी सगळ्यांची सगळी मतं बदलून टाकली. पाच वर्षांचा काळ मोठा नाही हे खरं. पण, राजकारणाच्या दृष्टीने असा पाच-सात वर्षांचाच काळ कसोटीचा असतो. या काळात तुम्ही कसोटीला उतरलात तर राजकारणी म्हणून तुमची मान्यता कायम होते. येता काळ कोणती आव्हानं घेऊन येणार आहे, माहीत नाही. पण, गेल्या पाच वर्षांत उद्धव ठाकरे यांच्यासमोर चढत्याक्रमाने आव्हानं उभी ठाकली आणि त्यांनी ती मोठ्या हिमतीने स्वीकारली, हे कोणीही मान्यच करेल.

मुळात उद्धव ठाकरे यांना कोणी राजकारणी मानायलाच तयार नव्हतं. राजीव गांधींसारखीच काहीशी सुरूवात होती. राजकारण्यासाठी जे रसायन लागतं ते या माणसात नाही, असंच सगळ्यांचं ठाम मत होतं. असं मतही सहानुभूती आणि भलेपणाचं वलय देत असतं. पण, शिवसेनेच्या नेत्याच्या नशिबी एवढं भाग्य नसतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला तर कोणीच असं सहज माप टाकणार नाही. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा हा त्यांच्या वरकरणी बोलण्याएवढाच जहाल असायला हवा अशी सर्वसामान्य माणसापासून प्रसिद्धी माध्यमांचीही अपेक्षा होती. या अपेक्षेला उद्धवपेक्षा त्यांचा चुलतभाऊ राज ठाकरे सहीसही उतरत होता. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचा उत्तराधिकारी, ठाकरे घराण्याचा राजकीय वारस आणि शिवसेनेचा पुढचा सेनापती राज ठाकरेच असणार असं गृहित धरून सगळे जण शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत होते. या समजाला पहिली ठेच लागली १९९७ साली. त्यावेळचे विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी रमेश किणी हत्याप्रकरण उकरून काढलं आणि राज ठाकरे यांच्याभोवती संशय ा चा फास पडला. संपूर्ण ठाकरे कुटुंबाने आपलं सारं बळ प्रामाणिकपणे लावूनही राज ठाकरे यांच्यावर पडायचा तो शिक्का पडलाच. उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जन्माला ही घटना कारणीभूत ठरली, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.

राज ठाकरे किणी प्रकरणाच्या खोड्यात अडकल्याने साहजिकच उद्धव ठाकरे यांच्यावर एकेक जबाबदारी येत गेली. १९९९ मध्ये भारतीय जनतापक्षाबरोबरच्या युतीतील जागा वाटपात ते शिवसेनेचे नेते म्हणून बसले. मदतीला सुभाष देसाई आणि मनोहर जोशी यांच्यासारखे पक्के "चिटणीस' होते. निवडणुकीच्या राजकारणाचा अंदाज केवळ ठोकताळ्याने घेण्यापेक्षा शास्त्रीय नेटकेपणाने घेण्याचा प्रयत्न उद्धव यांनी केला. शिवसेनेने अशा पद्धतीने पहिल्यांदाच राजकारण केल्याने अगदी खालच्या आवाजात उद्धव ठाकरेच्या या "पुस्तकी' राजकारणाची खिल्ली उडवली जात होती. उद्धव ठाकरे यांनी मोठ्या आत्मविश्‍वासाने त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण १९८५ आणि १९९० च्या महापालिका निवडणुकीचं "कॅम्पेनिंग' त्यांनी केलं होतं. "चौरंग' नावाची जाहिरात आणि जनसंपर्क एजन्सीद्वारे राजला बरोबर घेऊन १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं प्लॅनिंगही उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. आपल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधल्या मित्रांच्या आणि अनुभवाच्या आधारे हे कॅम्पेनिंग आणि प्लॅनिंग केलं असलं तरी अशा कामाला राजकीय दृष्टी अपरिहार्य असते हे कोणी नीट लक्षात घेतलं नाही. प्रचारातही राजकीय डावपेच असतात, कूटनीती असते आणि युक्तीवादही असतो. त्यासाठी राजकीय भूमिका अपरिहार्य असते.. जमिनीखालचे प्रवाह समजून घ्यावे लागतात आणि राजकीय भूमी कुठे हादरेल याचा अंदाज घ्यावा लागतो. सिद्ध आणि प्रसिद्ध पुढारपण नसल्याने उद्धव ठाकरे यांना हा गृहपाठ व्यवस्थित करता आला. गेल्या पाच वर्षांत त्यांनी आपल्या डावपेचात जी राजकीय परिपक्वता द ा खवली त्याला या गृहपाठाचाच आधार असणार असं मानायला जागा आहे.

कार्याध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या पक्षाची सूत्रं हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन राजकीय कार्यक्रम दिले. एक ः शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या समन्वयाचा आणि दुसरा ः मी मुंबईकर या नाऱ्याचा. हे दोन्ही कार्यक्रम शिवसेनेला पडलेल्या मर्यादा तोडणारे आणि नवा राजकीय आधार शोधणारे होते. एका कार्यक्रमातून जातीचं वास्तव स्वीकारल्याची जाणीव होती. ही ताकद जोडली गेली तर पक्षाची प्रतिमा बदलेल अशी आशा होती आणि विरोधी पक्षांची वोटबॅंक खिळखिळी करता येईल, असं गणित होतं. त्यासाठी आवश्‍यक असणारी माणसांची पारख मात्र झाली नाही. नामदेव ढसाळ आणि तत्सम आधांतरी नेते बरोबर घेऊन प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला. तो सपशेल फसला. दुसरा प्रयोग आपली राजकीय भूमिच बदलण्याचा होता. ज्या मराठी माणसासाठी आणि मराठी आवाजासाठी शिवसेनेचा जन्म झाला आणि मराठी जनांनी तिला आधार दिला तीच शिवसेना परप्रांतीयांना जवळ करू लागली. हिंदुत्वाचा फॉर्म्युला वापरण्यापेक्षा आणि त्यानिमित्ताने भाजपबरोबर फरफटत जाण्यापेक्षा या फॉर्म्युल्याची चव जमली तर बघावी, असा या नव्या नेतृत्त्वाचा विचार होता. त्यामुळे, शिवसेना "मी मराठी'ऐवजी "मी मुंबईकर'चा नारा देऊ लागली. मराठी टक्का सोडून अन्य प्रांतियांची बेरीज करीत आपला टक्का वाढवायला पाहू लागली. याचीही पुरेशी तयारी केली गेली नाही. जनमानसाची चाचपणी झाली नाही. संघटनेला विश्‍वासात घेतले नाही. पेडर रोड आणि कार्टर रोडच्या तथाकथित "सामाजिक जाणीव'वाल्यांच्या सहभागाने गाणीबिणी बसली, पण नंतर ही मोहीमच बसली. दुसरा प्रयोगही गुंडाळून ठेवावा लागला.

राजकारणात नीट जम बसवायचा आणि पक्षाला सत्ताधारी करायचे तर आधी सत्ताधारी म्हणून पक्षाव र नीट मांड बसवली पाहिजे, याची जाणीव उद्धव ठाकरेंना बरीच आधी झाली असावी. त्यामुळे त्यांनी आपलं सगळं लक्ष पूर्णपणे संघटनेवर केंद्रीत केलं. संघटना आणि संघटनेतील माणसं समजावून घेतली. त्यांची नव्याने ओळख करून घेतली. संघटनात्मक रचनेतील प्रत्येक पातळीवरच्या माणसाचं महत्त्व आणि त्याची विचार करण्याची पद्धत लक्षात घेतली. महापालिकेच्या २००२ मधील निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या या संघटनात्मक ज्ञानाची पहिली चाचणी घेतली. संपूर्ण उमेदवारी वाटप त्यांनी आपल्या हाती घेतले. राज ठाकरे यांना शिवसेनेत त्याचवेळी पहिल्यांदा असुरक्षित वाटले. त्यांनी आपल्या समर्थकांकरवी आदळआपट करून पाहिली. पण, उद्धव ठाकरे यांनी त्याची अजिबात दखल घेतली नाही. आपली समिकरणे आपण मांडायची आणि शास्त्रीय पद्धतीने ती सोडवायची. आपला आणि शिवसैनिकांमधील संवाद हाच खरा, बाकी सगळ्यांचे सल्ले आणि अधिकार गौण अशा ठाम विश्‍वासाने उद्धव ठाकरे यांनी ती निवडणूक हाताळली आणि यशही मिळवलं. उद्धव यांच्या या यशाने शिवसेनाप्रमुख आश्‍वस्त झाले आणि त्यांची सारे प्रतिस्पर्धी पहिल्यांदा धास्तावले. उद्धव ठाकरे यांची राजकारणी म्हणून दखल तेव्हापासूनच घेतली जाऊ लागली.

घरात राज ठाकरे आणि पक्षात नारायण राणे असे दोन प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे यांना छळत आणि सलत होते. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा "ऑपरेशन राणे' हाती घेतलं. पद्धतशीरपणे त्यांनी राणेंचे पंख कातरले आणि त्यांना उडण्यासाठी मजबूर केलं. शिवसेनेतल्या कोणत्याही नेत्याने शिवसेनेच्या नेतृत्वावर केली नसेल अशी टीका राणे यांनी केली. "सामना'ने राणे यांचा मुखभंग करण्याची एकही संधी सोडली नाही. पण, ही लढाई लढावी लागली ती उद्धव ठाकर? यांनाच. शिवसेना नेत्यांपैकी कुणाचीही मदत यावेळी उद्धव यांना होऊ शकली नाही. आपल्या मर्यादित वक्तृत्वाच्या आणि राजक ी य अनुभवाच्या शिदोरीवर उद्धव यांनी ही लढाई केली. भावनिक सौदेबाजी करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जखडून ठेवायचे आणि दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कर्तृत्वहीनतेचे आणि त्यांच्या निकटच्या व्यक्तींविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करायचे असे "नारायणास्त्र'ही त्यांनी यथावकाश निष्प्रभ केलं. शिवसैनिकांच्या मनात स्वतःविषयी विश्‍वास निर्माण केला.

कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे यांनी शिवसेनेवर राजकीय हल्ले करायला सुरूवात केली. त्यांचा अश्‍वमेधाचा वारू अखेर श्रीवर्धन मतदारसंघात अडकला. शिवसेनेच्या तुकाराम सुर्वे यांनी राणेसमर्थक कॉंग्रेसच्या श्‍याम सावंत यांचा पराभव केला. त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघातही राणेसमर्थक सुबोध मोहिते यांचा पराभव झाला. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या दीपक सावंत यांनी मिळविलेला दणदणीत विजय अनेकांना तोंडात बोटं घालायला लावणारा ठरला. कोणत्याही राजकारण्याची किंमत शेवटी निवडणुकीच्या रणांगणातच ठरते. उद्धव ठाकरे यांची किंमत या तिनही विजयांनी चांगलीच प्रस्थापित केली.

राणेंपाठोपाठ राज ठाकरे यांचा क्रमांक लागला. राणेंपेक्षा हे प्रकरण वेगळं होतं. ही शस्त्रक्रिया जोखमीची होती. पण तीही उद्धव ठाकरे यांनी करून दाखविली. शिवसेनाप्रमुखांनंतर महाराष्ट्रात करिष्मा असलेलं एकमेव युवा नेतृत्व म्हणून ज्याकडे पाहिलं जात होतं त्याच्या साऱ्या प्रभा मिटवून टाकणं सोपं नव्हतं. "सामना'चे कार्यकारी संपादक आणि खासदार, राज ठाकरे यांचे एकेकाळचे जीवलग संजय राऊत यांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरणही वर्षा दीडवर्षात मिटवून टाकलं. आता शिवसेनेच्या वाघावर उद्धव ठाकरे पक्के स्वार झाले आहेत.

शिवसेना वाढली ती बाळासाहेब ठाकरे या एकाच माणसाच्या करिष्म्याने. पण तरी या करिष्म्याला आधा र शिवसेनेच्या नेत्यांचा होता. सुरूवातीचे अष्टप्रधान मंडळ नंतर डझनावर गेले. उद्धव ठाकरे यांनी सूत्रं हाती घेऊन पाच वर्ष झाली तरी शिवसेना नेता म्हणून कोणालाच मान्यता दिली नाही. सुरूवातीला केवळ देसाई-जोशी यांच्या मदतीने कारभार हाकला. आता संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर या दोन वेगवेगळ्या पातळीवरील सहकाऱ्यांच्या मदतीने ते शिवसेना चालवत आहेत. भारतीय जनता पक्षासारखा मित्रपक्ष नियंत्रणात ठेवणे सोपी गोष्ट नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी सुरूवातीला पोट निवडणुकांतील जागावाटपात आणि नंतर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवेळी या पक्षालाही झटके दिले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्या पक्षाला योग्य तो संदेश दिला. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आपल्यावर निर्धास्त राहणार नाही अशी वातावरण निर्मिती करून ठेवली. कॉंग्रेसपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसपर्यंत मोठ्या कौशल्याने राजकीय तडजोडी केल्या आणि पक्षासाठी आवश्‍यक असलेले यशाचे इंधन अधूनमधून पुरविण्यात यश मिळविले. शिवसेनेतून पूर्वीच बाहेर पडलेल्या नेत्यांशी झालेले कटू संबंध संपवून शुभसंकेतांचे नाते निर्माण केले. त्याचा फायदा त्यांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत झाला म्हणतात!

उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार फारादिवसांनी "मातोश्री'वर पोहोचले. ही भेट शिवसेनाप्रमुख आणि पवार या दोन ज्येष्ठ-जाणत्या मित्रांमधली होती हे मान्य केले तरी ते उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेशिवाय झाली असेल यावर राजकारणातला दुधखुळाही विश्‍वास ठेवत नाही. एकेकाळी एकट्या पडलेल्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या राजकीय मदतीवर ताकद कमाविणाऱ्या शिवसेनेची राजकारणातील जागा आता पूर्णपणे बदलली आहे. शिवसेनेशी हातमिळवणी क र ायला सगळे तयार आहेत आणि शिवसेनाही स्वतःचा चेहरा अधिकाधिक मित्रत्वाचा करते आहे. मराठी अजेंडा आता फार काळ टिकणार नाही हेच स्पष्ट असल्याने शिवसेनेची जागाही संकोचत जाईल हा राजकीय पंडितांचा अंदाज खोटा ठरविण्यासाठीच जणू उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं "पोलिटिकल पोझिशनिंग' बदलण्याचं शिवधनुष्य उचललेलं दिसतं!

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातले संबंध कमालीचे ताणले गेले होते. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी "घटस्फोटा'ची भाषा सुरू केली होती. पण, पाऊल पुढे टाकूनही उद्धव यांनी जीभेला मात्र लगाम घातला होता. एकेठिकाणी बोलताना ते म्हणाले होते, "मेरे पास संयम भी है, और समय भी!'

उद्धव यांनीच आपल्या यशाचं गुपित अनवधानाने असं सांगून टाकलेलं दिसतं.

No comments:

Post a Comment